Saturday, 3 March 2012

गृहीतके....जीवनातली...!



"खूप दिवस झाले सवड मिळाली नाही. जेंव्हा सवड होती तेव्हा मूड लागला नाही. आज सवड आहे...मूड पण आहे. मनमोकळ्या गप्पा मारुयात..!" फोनवर तिकडून मित्राचा आवाज आला.

हा माझा लंगोटीयार...! याला नाराज करणं माझ्या जीवावर आलं होतं पण मी तेव्हा अत्यंत महत्वाच्या कामामध्ये गुंतलेलो होतो..

"काय काही विशेष..." मी त्याला तुटकपणे विचारलं...

"का..? तू काही कामात आहेस का ?"

लंगोटीयारच तो...त्यानं बरोबर पकडलं....!

"हो...मी तुला रात्री फोन करू का?" "असं कशाला...मी तुला रात्री फोन करतो....ठीक आहे...?" असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न पाहताच मी फोन ठेवला. पुन्हा डोकं चालू असलेल्या कामात घातलं.

"एवढे कसे हो तुम्ही तुसडे...?" एवढा वेळ निमुटपणे आमचे संभाषण ऐकत असलेल्या सौभाग्यवतीने आपला शेरा दिला..... कम..... प्रश्न विचारला.

"का..? काय झालं?" माझं कामातलं लक्ष पुन्हा विचलीत झालं .

"कुणाचा फोन होता?"

"सरदार चा...." मी शक्य तितक्या शांतपणे...!

"मग त्यांच्याशी दोन शब्द तर नीट बोलायचे की नाही....काय वाटलं असेल त्यांना..."

"काय वाटणार आहे...मी कामात आहे असंच वाटलं असेल...!"

"हेच ...हेच....तुमच्या ह्या अशा वागण्यामुळेच सर्वांशी वैर पत्कारा..!"

"वैर...? वैराचा कुठे संबंध येतो इथे...? काय वाट्टेल ते बोलू नकोस. "

"एवढा जिवलग मित्र तुमचा....काय वाटलं असेल त्यांना...स्वतः तर फोन करत नाही , समोरच्याने केला तरी बोलत नाही...अशाने सगळ्यांचा रोष ओढवून घ्या .....नातेवाईक तर तुटलेलेच आहेत , आता मित्रांनाही तोडून टाका....!"

"एवढं काही झालेलं नाही ...मी त्याला रात्री फोन करतो म्हणून सांगितलेलं आहे..."

"रात्री आठवण राहील तेव्हा ना..!"

"काही बिघडत नाही एवढं...माझा मित्र आहे तो...त्याला माझा स्वभाव चांगला माहिती आहे..."

"जन्मभर असं सगळ्यांना गृहीत धरत चला व शेवटी एकटे पडा...नाहीतरी तुम्ही एकलकोंडेच आहात म्हणा!"

"हे बघ मला माझं एवढं काम संपवू दे मग आपण या विषयावर वाट्टेल तेवढं बोलू ..." आता मी पूर्णपणे वैतागलेलो होतो.
तिने माझा मूड बघितला व ती तिच्या कामाला लागली. मी तिच्याकडे बघितलं नाही पण तिच्या चेहऱ्यावर नक्कीच "या माणसाला कोणीही सुधारू शकणार नाही " असेच भाव असणार...

तासाभरात मी माझं काम संपवलं...सगळे पेपर्स नीट ठेवले ..मग घरातला कानोसा घेतला. संध्याकाळचे सात वाजले होते...ही किचन मध्ये काहीतरी करत होती...कामाच्या ताणामुळे डोकं अगदी जड पडलं होतं...मन थकून गेलेलं होतं ...थोडं बाहेर फिरून यावं म्हटलं तरी बाहेर पडायची मुळीच इच्छा नव्हती. तसाच सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून शांतपणे बसलो. थोडं बरं वाटलं.

तेवढ्यात ही चहा घेऊन आली.

"अरे वा...मला आता चहा हवाच होता...." मी खुशीत येवून म्हणालो.

"तुमच्या मनात काय ते ओळखून असतो आम्ही...तुम्हाला मात्र दुसऱ्याच्या मनाची काहीही पर्वा नसते..!"

हिला तो मघाचा विषय वाढवायचा होता. मी त्या मूडमध्ये नव्हतो. मी गप्प. मिनिटभर वाट पाहून ती निघून गेली. तिचा मूड गेलेला होता.

चहाचे घोट घेता घेता मला आठवलं ...मघाशी ती एक सुंदर वाक्य बोलली होती... "जन्मभर असं सगळ्यांना गृहीत धरत चला...."

गृहीत धरणे....खरच आपण आपल्या रोजच्या जीवनात कितीतरी गोष्टी गृहीत धरून चालत असतो. आता हेच पहा ना थोड्या वेळापूर्वी जेव्हा मला मित्राचा फोन आला होता तेव्हा त्याने मी त्याच्याशी मोकळ्या गप्पा मारेल असं गृहीत धरलं होतं. त्याउलट मी सुद्धा त्याला रात्री फोन करतो असं सांगून फोन ठेवला तेव्हा त्याला राग येणार नाही...तो माझी अडचण समजून घेईल हे गृहीत धरलं होतं. एवढंच नाही...दररोज आपण आपल्या नियमित जीवनात अनेक गोष्टी अश्याच गृहीत धरत असतो.

सकाळी उठून ब्रश केल्याबरोबर आपल्याला पत्नीकडून गरमागरम चहा मिळणार आहे हे आपण गृहीत धरलेलं असते...सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जातो तेव्हा समोरून ओळखीची व्यक्ती दिसताच त्याच्या ओठावर ओळखीचं हास्य आपण गृहीत धरलेलं असते... सकाळी सकाळीच रात्री गस्त घालणारा गुरखा जेव्हा आपल्याला कडक आवाजात "सलाम शाब" असं अभिवादन करतो तेव्हा या महिन्याचे त्याचे गस्तीचे पैसे अजून त्याला घरातून मिळालेले नाहीत व ते तो मागण्यासाठीच आला आहे हे सुद्धा आपण गृहीत धरलेले असते.

ऑफिसात गेल्यावर आपल्या हाताखाली काम करणारी मंडळी हसून अभिवादन करणार, आपण थोडे जरी उशिरा गेलो तरी बॉस हमखास "तिरप्या" नजरेने पाहणार, मग संध्याकाळी हमखास काहीतरी अवघड काम सोपवून आपल्याला उशीर करणार, आपल्या कामाचे वरिष्ठांनी कौतुक केले तर सहकारी मनातून जळणार पण वरवर मात्र आपली स्तुती करणार, अश्या असंख्य गोष्टी आपण सवयीने गृहीत धरत असतो.

गृहीत धरण्याची ही सवय आपली जुनीच असते. जुनी म्हणजे अगदी आपल्या जन्मापासूनची असते.

जेव्हा आपल्याला काही कळतही नसते तेव्हा सुद्धा आपण रडलो की आई आपल्याला दुध पाजेल हे आपण गृहीत धरूनच रडत असतो . थोडे रुसून बसलो की आई बाबा आपले हट्ट पुरविणार, बाबांकडून कुठली गोष्ट हवी असली की ती आईकडे मागावी म्हणजे बाबांना न मागताच ती आपल्याला मिळेल, बाहेर खेळायला जायचे असल्यास अर्धा तास आधी अभ्यास सुरु करावा म्हणजे मग आईकडून परवानगी हमखास मिळेल, नवे कपडे हवे असल्यास जुने कसे आखूड होतात हे सांगायला सुरुवात करावी म्हणजे नवे मिळतील, या व इतर अनेक गोष्टी आपण लहानपणी गृहीत धरलेल्या असतात.
या गृहीत धरलेल्या बाबी जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग आपण निराश होतो..रागावतो...चिडतो व मग आपण आपल्या मनाचा तोल सोडतो. मग गैरसमज वाढतात.. चांगले संबध बिघडतात...एकंदरीत काय की जीवनातला आनंद कमी कमी होत जातो..
शालेय जीवनात असतांना भूमितीची गृहीतके शिकलो होतो.....भूमितीतल्या गृहीताकांसारखी जीवनातली ही वर सांगितलेली गृहीतके प्रत्येक वेळी खरी ठरतीलच असे नाही...जीवनातल्या गृहीतकांमध्ये व भूमितीच्या गृहीतकांमध्ये हाच मोठा फरक आहे...भूमितीची गृहीतके प्रत्येक वेळी खरी ठरतात . ती अचूक असतात. पण जीवनातल्या गृहीताकांचे असे नाही. ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. म्हणूनच जीवनात आपले सर्वच अंदाज अचूक नसतात..

जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनातल्या ह्या गृहीताकांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक असते...कुणाशी कधी कसं व काय बोलावं हे समजलं पाहिजे. कुठे कसं वागावं याची पुरती जाण असावी. कुठल्या कामाला कधी किती महत्व द्यावे हे समजलं पाहिजे...समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज असावा....दुसऱ्यांच्या भावना ओळखता याव्यात....अश्या असंख्य गोष्टी....घटना....अनुभव....यातून मनुष्य जीवनातल्या गृहीतकांमध्ये पारंगत होतो...मग अश्यावेळी यशोशिखर दूर नसते...!

 

  

   
    

Monday, 23 January 2012

निव्वळ योगायोग......!

     स्वप्नं सगळेच पाहतात....काहींची सत्यरूप धारण करतात...काहींची स्वप्नं ही अखेर पर्यंत स्वप्नंच राहतात....जे भरकटतात त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत.....स्वप्नांच्या पूर्तीसाठी कष्टांची सोबत असावी लागते....ध्येयवेडा कधीच भरकटत नाही...तो आपल्या लक्ष प्राप्तीसाठी वाटेल ते करतो व आपले लक्ष प्राप्त करतो....! अश्याच एका ध्येयवेड्या मुलाचा आज समाचार घेऊ....!
वार : रविवार   दिनांक  २२ जानेवारी २०१२ 
सकाळीच फोन वाजतो... एक होस्टेल मध्ये राहणारा विद्यार्थी....त्याच्या घरून फोन असतो....तो फोन ऑन करतो....वेळ सकाळी ९.०० 
तो: HALLOW 
बाबा : HALLOW ...  काय चालू आहे...?
तो : काही नाही ....अभ्यास करत होतो....!
बाबा: अरे वा...!  एवढ्या सकाळी सकाळी अभ्यास....?
तो: हो....
बाबा : तब्येत ठीक आहे न तुझी..?
तो: हो ...चांगली आहे...पण का विचारताय असं?
बाबा: एवढ्या सकाळी सकाळी अभ्यास करतो आहेस म्हणून विचारलं.
तो: नाही ...आज सकाळी पाचलाच उठलो....अभ्यासाला लागलो...
बाबा: अरे वा$$$...असाच लवकर उठत जा व अभ्यास करत जा....
तो: हो ...दररोज लवकर उठून अभ्यास करतो...रात्री पण अभ्यास करता करता खूप उशीर होतो झोपायला....
बाबा: परिक्षा जवळ आली की काय तुझी .....?
तो: नाही अजून खूप वेळ आहे ....पण आतापासून अभ्यासाला  लागलो ....
बाबा: छान ...चालू दे तुझा अभ्यास ...मी नंतर फोन  करेन...
तो : ठीक आहे ...(फोन DISCONNECT  करतो ...)
नंतर बेड वरून उठून आळस देत रूम पार्टनर ला म्हणतो....
"बाबांचा फोन होता...बरं झालं मी पाच मिनिटांपूर्वी उठलो होतो ...नाहीतर  त्यांनी माझा झोपेतला आवाज ओळखला असता ....
वेळ दुपारी २.००
त्याच्याच घरचा फोन .....आता फोन वर त्याची आई....
"काय करतोयस बेटा....?"
"मी आता college मध्ये आहे...पाच मिनिटात लेक्चर सुरु होईल...मी नंतर फोन करतो...."
फोन कट करतो...
वेळ रात्री ९.००
त्याचाच फोन ....यावेळी पुन्हा बाबा व आई दोघेही....
"काय,,,,जेवलास काय...?
"नाही अजून...जेवायलाच निघालो होतो...."
"का रे एव्हढा उशीर....?"
"college मधून आल्यावर थोडे वाचले....मग submission चे काम केले...उशीरच झाला थोडा ...आता जेऊन आल्यावर पुन्हा reading रूम मध्ये जाणार आहे..."
"ठीक आहे मग...तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन कर...तब्येतीची काळजी घे....पैसे आहेत ना...? कि संपले...? अकौंट मध्ये टाकू का काही...?"
"नको...सध्या आहेत ....संपले की सांगेन मग...."
"ठीक आहे..."
फोन disconnect ...
     त्याच विद्यार्थ्याची ही कालची लिहिलेली DIARY.....
दिनांक ..२१ जानेवारी २०१२     वार..शनिवार 
      आज सकाळी लवकर जाग आली नाही. ...दररोज पण लवकर येत नाही ...आजपण आली नाही...रात्री झोपायला उशीर झाला होता..तसा  काल लवकर झोपायचा विचार होता ...बेडवर पडल्यानंतर रात्री अकराला संज्याला (रूम पार्टनर) चहा प्यायची हुक्की आली...त्याने मला जबरदस्तीने उठविले ...चहा पिण्यासाठी...मी सुद्धा "चहाचे बिल तुला द्यावे लागेल " हे त्याच्याकडून कबूल करवून घेतले व मगच उठलो.! संज्या म्हणजे एक नंबरचा "कंजूस"! याच्या खिशात नेहमी नेमके पैसे असतात..!आज तावडीत सापडला होता ....मग मी विन्या व दत्त्यालाही उठविले..ते सुद्धा संज्या चहा पाजतोय  ऐकून लगेच उठले ...नंतर संज्या साला बदलेल म्हणून आम्ही पहिल्यांदा त्याचे खिसे चेक केले... त्याच्या खिश्यात वीस रुपये घ्यायला लावले व मगच रूमबाहेर पडलो....नेहमीचा चहावाला बंद होता...संज्याने हीच संधी साधली... तो म्हणाला ...
" अरे !..टपरी बंद झाली ....चला परत जाऊ."
...पण आता आम्ही तयार नव्हतो ..."पुढच्या चौकात जाऊ म्हणून पुढे गेलो...तेथेही बंद...नंतर पुढचा चौक ...असे करता करता अर्धे शहर पालथे घातले तेंव्हा कुठे "बस-stand वर चहा मिळाला...चहा मिळाल्याच्या आनंदा  पेक्षा संज्याचे पैसे खर्च झाले हा आनंद आम्ही एन्जॉय करीत परत फिरलो...सगळीकडे शांतता होती......फक्त आमचाच तेवढा आवाज होता...मधेच पोलिसांची गस्तीची गाडी येतांना दिसली ..मग आम्ही गुपचूप होस्टेल वर परतलो....तेव्हा रात्रीचा एक वाजला  होता...चहासाठी दोन तास गेले होते...मनात विचार आला...बाबांना हे माहित पडलं तर ते म्हणतील...."एव्हडा वेळ अभ्यासात घालविला असता तर एखादा मार्क तरी वाढला असता परिक्षेत....! 
     कसातरी तयार होऊन कॉलेज मध्ये गेलो, वर्गात आपल्या सीटवर बसता बसता मुक्या बाहेर corridor मध्ये फिरतांना दिसला. त्याला आवाज दिला पण त्याचे लक्ष नव्हते. मी उठून बाहेर जाणार होतो पण तेव्हढ्यात सर क्लास मध्ये आले. मग बाहेर जाता आले नाही. लेक्चर एकदम बोअर होते. नोटबुक च्या शेवटच्या पानावर सरांचे स्केच काढायचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे सरांचे नाक काढणे जमले नाही. मग नुसत्या सह्या करीत बसलो.. नंतरही वर्गात लक्ष नव्हतं. दुपारी शेवटचे दोन lectures off होते. मुक्या  (मुकेश) सोबत बाहेर  गेलो.. A T M मधून  पैसे काढले ...जास्त काढायचे होते पण बाबांच्या mobile वर message जातो म्हणून कमी काढले ...नाहीतर बाबांचा लगेच फोन आला असता....मुक्याने त्याच्या घरी नेले ...त्याच्या आईने तिळाचा  लाडू खायला दिला ...तेव्हा आईची आठवण झाली...तिच्या  हातचे तिळाचे  लाडू खूप  छान लागतात...तिच्या हातचे लाडू...चिवडा...व इतर पदार्थ ....सर्वच एकदम बेस्ट...सुटीतून जेव्हा परततो तेव्हा ती सर्व प्रेमाने बांधून देते...होस्टेल वर एका दिवसात त्या सर्व फराळाचा फडशा पडतो...
     मुक्याने त्याच्या गाडीवर मला होस्टेलवर सोडले  व तो गेला. विन्या आज घरी जाणार होता...तो गेला असेल असे वाटले पण पक्या भेटला तो म्हणाला विन्या उद्या जाणार आहे....आमची सहल महाबळेश्वर ला जाणार होती...notice  बोर्ड वर काही आले काय ते पाहायला मी आणि विठ्या पुन्हा कॉलेज मध्ये गेलो..काहीही नव्हते...तिकडे अम्या भेटला त्याला notebooks घ्यायचे होते ..आम्ही सर्व stationary  दुकानात गेलो. नंतर होस्टेल वर परतलो....दुकानदाराने अम्याकडून 20 रुपये कमी घेतले होते.... चुकून..!.......ते परत देण्याच्या विचारात आम्ही होतो...पण नंतर आम्ही आमचा विचार बदलला... दुकानदार आम्हाला खूप लुटतो...म्हणून आम्ही पण पैसे परत केले नाही...आज रात्री त्या पैश्यात चहा पिऊ..! असा विचार केला.
      रात्री जेवण करून परतलो . आता अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे...पण पुस्तक हातात घेतल्यावर अभ्यासात मन लागत नाही. मन इकडे  तिकडे भरकटत असते. सात महिने झाले कॉलेज सुरु होऊन पण अभ्यासाला अजूनही सुरुवात झालेली नाही. परिक्षा जवळ आली की मग तारांबळ उडते...! मग अभ्यास पूर्ण होतंच नाही .तसंच परिक्षेला जावं लागते .. जे येइल ते सोडवायचे बाकी मग result ची वाट पाहण्यापलीकडे काय करू शकतो आपण...?....अश्याच काही विचारात मग वेळ निघून गेला.....अखेर शेवटी झोप येवू लागली. झोपण्या पूर्वी diary लिहावी म्हणून बसलो आहे . एवढं लिहिलं..झालं....आता झोपणार...! गुड नाईट...!
    टीप : हे सर्व कुणा एकाला नजरेसमोर ठेऊन लिहिलेले नाही...हे सर्व काल्पनिक आहे...यात कुणाला "हे सर्व आपल्यावरून लिहिलेले आहे" असे वाटल्यास तो निव्वळ  योगायोग समजावा ...! 
निव्वळ योगायोग......!

Saturday, 21 January 2012

! मन....एक विचित्र रसायन...!

     माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे. मानवाची निर्मिती उत्क्रांती मधून झाली हे जरी सर्वमान्य असले तरी, म्हणजे माकडापासून माणूस निर्माण झाला हे जरी सर्वमान्य असले तरी एक मात्र निश्चित आहे, ज्या प्रकारच्या माकडापासून माणूस झाला ते माकडही त्या काळातल्या  (म्हणजे माकडाचे माणसांत रुपांतर होण्याच्या आधीच्या काळातल्या) अन्य सर्व माकडामद्धे नक्कीच  "इब्लीस" म्हणूनच प्रसिद्ध असावे! तसं नसतं तर कदाचित त्याला माणूस होताही आलं नसतं! ....ते माकड इब्लीस असेल म्हणूनच त्याने त्या काळातल्या इतर माकडांप्रमाणे फक्त झाडांवर इकडून तिकडे उड्या मारण्यात समाधान मानले नसेल ,.... रानावनातील कंद मूळे खाऊन तृप्तीची ढेकर दिली नसेल,.... की "आपण भले नि आपले माकडचाळे भले" असा मोलाचा संदेशही मनावर बिंबवून घेतलेला नसेल...! त्याने निश्चितच त्या काळातही काहीतरी नवे करण्याची जिद्द आपल्या उराशी बाळगली असेल! एखादा उनाड मुलगा जसे त्याच्या वयातील इतर मुलांपेक्षा वेगळा वागतो तसे तो वागत असेल. म्हणूनच आजही एखादा बाप जेंव्हा आपल्या उनाड मुलाला, "माकडचाळे करू नकोस " असे म्हटल्याचे मी ऐकतो तेव्हा प्रत्येक वेळी हा मुलगा मोठेपणी काहीतरी वेगळा असामान्य व्यक्ती होणार आहे असे मला उगीचच वाटत असते!
     काही का असेना....अश्या उनाडक्या करूनच माणसाने आपली प्रगती केली आहे. म्हणूनच हे सर्व लिहिण्याच्या आधी माझ्या मनात विचार आला होता..."माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे"...आजही आपण आपल्या आजूबाजूला वावरतांना पाहतो.... जो सरळमार्गी, चाकोरीबद्ध जीवन जगतो..तो सर्वसामान्य, मध्यमवर्गीय या कॅटेगरी मध्ये मोडतो....तो नेहमी नियमानुसार वागतो ....तो लहानपणापासूनच असा असतो...म्हणजे अगदी पहिली -दुसरीत असतांना गुरुजींनी "तोंडावर बोट ठेवा" असे सांगितल्यानंतर  त्यांनी "तोंडावरून बोट काढा" असे सांगेपर्यंत ह्याचे बोट प्रामाणिकपणे तोंडावरच राहणार...! उनाड मुलांप्रमाणे तो कधीही गुरुजींचा डोळा चुकवून एका सेकंदासाठी का होईना ..एकदाही तोंडावरून बोट काढणार नाही...मधूनच खी$क करून हसणार नाही .....जीवनाचा कुठलाही आनंद चोरून घेणार नाही ....सर्व आयुष्य प्रामाणिकपणे जगणार....समाजाला घाबरणार .....कुणी आपल्याला नाव ठेवू नये याची दक्षता घेणार...आदर्श जीवन जगत असल्याचा आव आणणार .....स्वतःच्या आवडी-निवडींना मुरड घालणार....वयात आल्यानंतर एखाद्या मुलीवर प्रेम करीत असतांना तिला कधीही ते माहित होऊ देणार नाही...तिनेच पुढाकार घेतला तरी रक्षाबन्धनाला तिच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांसमोर तिला राखी बांधायला भाग पाडणार...!!!
     लिहिता लिहिता  बहुतेक थोडा भरकटलो आहे...म्हणूनच हे सर्व लिहिण्याच्या आधी माझ्या मनात विचार आला होता..."माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे"...जो सरळमार्गाने न जाता आपली वेगळी वाट निवडतो त्याला आपण "वेडा" म्हणून संबोधतो....त्याच्याकडे आपण नेहमी संशयाच्या नजरेने पाहतो ....पण तो आपली चाकोरी सोडून जरी वागत असला तरी त्याच्याकडे नवनिर्मितीच्या संकल्पना असतात हे आपण नेहमी दुर्लक्षित करीत असतो...अश्या वेड्यांनीच नव-नवीन शोध लावलेले आहेत हे आपण विसरतो...असे वेडे या जगात आहेत म्हणूनच आपण ऐषारामात राहू शकतो हे आपण विसरतो... या वेड्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी काहीतरी नवीन शोधण्यात घालविले म्हणून आपण जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतो आहोत हे आपण विसरतो....या खऱ्याखुऱ्या माणसांना आपण विसरतो ......हे विसरत असतांना बहुतेक आपण हे पण विसरत असतो की या "वेड्या"समोर आपण अजूनही "माकडे" च आहोत...!
     "माणसाचं मन "...एक विचित्र रसायन.....! हे लिहिता लिहिता मी सुद्धा थोडे विषयांतर केले आहे असे मला आता वाटू लागले आहे .... लिहितांना काही वेगळेच लिहायचे होते,,,लिहिले काही वेगळेच .......असा काहीसा प्रकार झाला आहे असे वाटते आहे ... तरी सुद्धा जे लिहिले ते वाचनीय असेल तरच वाचा अन्यथा "माकडचाळे" करू नका हीच विनंती......! आता संपवितो.... राहिलेले सर्व पुन्हा कधी...तरी...!!


Friday, 20 January 2012

मैत्री ....एक सुखद अनुभव....!

    परवाच पब्लिक स्कूल च्या वार्षिक मेळाव्याला जाऊन आलो. जुनी मित्र मंडळी भेटली. त्यांच्या सहवासात दीड दिवस घालवले. वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. बालपणीची ती मित्र मंडळी, ज्या वयात काहीही कळत नव्हतं, आई -वडील, भाऊ-बहिणी व फारतर आपले गुरुजन-जवळची नातेवाईक मंडळी यापेक्षा आणखी काही नाती असतात, मित्रांचाही आपल्या आयुष्यात फार मोठा सहभाग असतो, हे न कळण्याच्या, मित्र म्हणजे आपल्या लेखणीच्या बदल्यात आपल्याला चिंचा-बोरं देणारा, आपल्या डब्यातले पदार्थ आवडले तर त्याच्या डब्यातील त्याचा नावडता पदार्थ आपल्याला ऑफर करून त्याबदल्यात त्याच्या आवडीचा आपल्या डब्यातील पदार्थ मागणारा, वेळ प्रसंगी इतर वर्गामित्रांसमोर जाणीवपूर्वक आपली फजिती करणारा, विनाकारण आपले नाव गुरुजींना सांगणारा, त्यांनी शिक्षा केल्यानंतर आनंदी होवून फिदीफिदी हसणारा, आपल्या यशामुळे नाराज तर अपयशाने खुश होणारा - असा एखादाच स्मरणात राहणारा - त्यालाच कमी अधिक फरकाने मित्र समजण्याच्या कोवळ्या, म्हणजे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आम्ही आपले घरदार, आई-वडील, भाऊ-बहिणी यांना सोडून "शासकीय विद्यानिकेतन , चिखलदरा " येथे पुढील शिक्षणा साठी शाळेच्या वसतिगृहात राहावयास आलो होतो.  पहिला दिवस तर नुसता भांबावलेल्या अवस्थेत गेलेला. हळूहळू प्रत्येक जण आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागलेला..! सांगायचा उद्धेश हाच की काहीही न कळण्याच्या कोवळ्या वयात आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी कोणीही कोणाचा परिचित नव्हता... काही मुलाच्या गावातील मुले आमची सिनियर्स होती...त्या मुलांना त्या सिनियर्स चा आधार असायचा...इतकेच...! बाकी मात्र सगळीकडे काळोखाच होता..! हळूहळू आम्ही त्या वातावरणात रुळलो. काही काळानंतर एक संपूर्ण सत्य आम्हाला पटू लागलेलं होतं....इथे जे कुणी आहोत ते आपले आपणच आहोत....आम्हीच आमचे भाऊ बहिणी होतो आम्हीच आमचे आई-बाप होतो ...कुठल्याही संकटाला आमचे आम्हालाच तोंड द्यायचे होते...कुठलीही जटील समस्या आमची आम्हालाच सोडवायची होती....तिथे वडीलधाऱ्यांची कवच कुंडले नव्हती .....आईच्या मायेची उब नव्हती....! परिस्थिती अटळ होती...जगणे अनिवार्य होते...!!
     अशा परिस्थितीत आम्ही एकत्र आलेलो...हळूहळू कधी एकमेकांचे मित्र बनलो ते कळलंही नाही...आयुष्याची अशी संपूर्ण सहा वर्षे आम्ही एकत्र राहिलो....खेळलो.....भांडलो.....एकमेकांच्या खोड्या काढल्या .....एकमेकांना चिडविले......एकमेकांशी स्पर्धा केली......मारामाऱ्या केल्या....अबोला धरला ....   अबोल्यावरून आठवले ....एकमेकांशी अबोला असला की ती गोष्ट इतरांना लगेच समजे मग सर्व त्या अबोल्याला एन्जॉय करायचे.....चांगला मुहूर्त ....दसरा, संक्रांत ,होळी, अथवा अन्य कुठलाही शुभ दिवस पाहून दोघांना जबरदस्तीने दहापाच जण पकडून ठेऊन एकमेकांशी बोलायला भाग पडायचे....! अर्थात त्या दोघांनाही हे हवेसेच असायचे पण त्या वयातही प्रत्येक जण आपापला इगो जपून असायचा....! पहिल्यांदा मी बोलणार नाही हे मनोमन ठरविलेले असायचे....!बोलावेसे तर वाटायचे पण बोलायचे कसे....कमीपणा घ्यायचा कसा....ही समस्या इतर मित्र अशाप्रकारे सोडवायचे.
     सहा वर्षे अशीच निघून गेली....कालानुरूप आम्ही बदलत होतो...एकमेकांच्या साथीने मोठे होत होतो...एकमेकांच्या सुख दुखात हसत रडत होतो...आम्ही असे एकमेकात गुंतलो होतो....हे आम्हाला त्या वेळी समजलेलं नव्हतं....नसावं.....ते वयच तसं होतं ....आम्ही जिवलग मित्र बनलो होतो पण त्याची त्यावेळी जाणीव नव्हती ....शाळा सोडली.....पुढील शिक्षण....जीवनाचा संघर्ष....स्वतः च्या पायावर उभे राहण्याची धडपड.....यात आठ दहा वर्षे निघून गेलेली....त्या आठ दहा वर्षात पुन्हा अनेकांशी संपर्क....अनेक मित्र ....काही कॉलेज मधले .....काही नोकरीला लागल्यानंतर झालेले.....प्रत्येकाची पातळी वेगळी .....कुवत वेगळी.....मैत्रीतली ओढ वेगळी....! आतापावेतो आम्ही वयाने खूप मोठे झालेलो....असंख्य ओळखी ....असंख्य मित्र.....असंख्य परिचित....ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या....लहानपणी अनुभवलेली गरिबी संपलेली....! आयुष्य थोडं स्थिरावलेलं .......सारी सुख आवाक्यात आलेली.....अशावेळी जाणवली एक अनामिक हुरहूर.....एक पोकळी.....काहीतरी चुकल्याची जाणीव....काहीतरी निसटल्याची संवेदना .....मनाला लागलेली पण न कळणारी ....न उलगडणारी वेदना....! आयुष्याची सहा वर्षे ज्यांच्या सोबतीने ....आधाराने....घालविले ते मित्र कुठे असतील.....काय करीत असतील.....त्या काळात फोन नव्हते ....पत्रव्यवहार चालायचा.... कालांतराने तो कमी कमी व्हायचा....! ही मनाची तडफड एकट्याची नाही....बहुतेक आम्हा साऱ्यांचीच .....म्हणून आम्ही एकमेकांना महत्प्रयासाने शोधले....एकमेकांच्या संपर्कात आलो.....आणि ठरविले बालपणीचे ते दिवस वर्षातून दोन दिवस का होईना ...पण जगायचे....जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा ......पूर्वी सारखे एकमेकांच्या सुख दुखात सहभागी व्हायचे...मोकळेपणाने हसायचे....सर्व जग विसरायचे...लहानपणीची निखळ मैत्री अशीच कायम ठेवायची....त्यातून ह्या मेळाव्याचा जन्म झाला ...या दोन दिवसात आम्ही आमचं बालपण पुन्हा जगतो....! कारण त्या कोवळ्या वयातच आम्हाला मैत्री या शब्दाचा अर्थ कळला होता.......त्या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे ते कळलं होतं....आणि कळलं होतं मैत्री एक नातं नाही ........तो एक अनुभव आहे.....एक सुखद अनुभव...!!!
मैत्री ....एक सुखद अनुभव....!

Wednesday, 11 January 2012

मन वढाय वढाय .....

     काल कॉलेज सुरु झाले म्हणून सनी निघून गेला. त्या आधी आठवडाभर आधी जिंकू गेला होता. घर एकदम खाली झाले. ऑफिस मधून आल्याबरोबर थोडे वेगळे वाटले. घर एकदम व्यवस्थित होते. दिवाणावर laptop  नव्हता. चादर विस्कटलेली नव्हती. उशा  व लोड आपापल्या जागी निमुटपणे बसलेले  होते . सनी होता तेव्हा ते नेहमी एकमेकांच्या अंगा-खांद्यांवर विराजमान होऊन भांडणाऱ्या मुलांप्रमाणे आपापले कपडे (कवर) विस्कटून बसलेले असायचे. अवती भोवती वर्तमानपत्र  चिवडा बांधून आणून चिवडा काढल्या नंतर त्या कागदाचे जे रूप असते त्या रुपात दिसायचे. पण आज तसे नव्हते. सर्व काही व्यवस्थित आपापल्या जागा पकडून एकदम शिस्तबद्ध होते. गेला महिनाभर असं पहायची सवय नसल्यामुळे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटले. घर एकदम शांत होते. तीच शांतता खायला उठली. 
     हे असं चालायचंच असं मनाला समजावत थोडा relax झालो. तेवढ्यात ही म्हणाली--
'आज घर एकदम रिकामं रिकामं वाटते आहे. ' 
"हू...!"
"दिवसभराच काही करमत नाही."
"हू..."
"काय कराव काही सुचत नाही...."
"ती सिरीयल पहा न तुझी...."
"कोणती...?"
"जी तुला इतके दिवस सनी पाहू देत नव्हता..."
"ती पण पाहायचा आज मूड लागत नाहीये..   "
"का ...?"
"माहीत नाही..."
"मला माहिती आहे "
"सनीच कारण सांगाल...."
"मग ते नाही काय...?"
"तसंच काही नाही...ते कारण असेलही....पण नेमकं तेच कारण नाही...हे पण मला जाणवतेय."
"दुसरं कारणही मला माहिती आहे...आज तुला ती सिरीयल पाहायला कुणी विरोध करणारा नाही म्हणून....!"
"तसंही असेल कदाचित..."
"तसंही असेल नाही...तसंच आहे...माणसाचं मन हे असंच असते . ज्या गोष्टीला विरोध होतो तिकडेच ते धाव घेते...जे सहजपणे मिळत नाही, ते मिळविण्याच्या ते मागे लागते...जे मिळालेले असते त्याचा आनंद हा काही काळापुरता टिकतो...त्या नंतर आपलं मन पुन्हा नवीन काहीतरी मिळविण्याच्या मागे लागते...ते मिळवितांना विरोध झाला तर इर्षा वाढते...प्रयत्न वाढतात....आणि हे असं नेहमी व्हायलाच हवं...कुठलं तरी ध्येय ....कुठलं तरी उद्धिष्ट...मनामध्ये  असलं पाहिजे.....माणसाच्या जिवंतपणाचा तो पुरावाच असतो...अन्यथा माणसाला जगायला काही कारणच राहणार नाही....काहीतरी हवंहवंसं वाटणं.....नव काहीतरी मिळवावस वाटणं ....त्यासाठी योग्य मार्गानं वाटेल ते करायची तयारी असणं.....यालाच जीवन म्हणतात....ज्याच्या मनात या उर्मी दाटून येत नाहीत तो माणूस ...माणूस नाही...त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही...आणि आपले इप्सित साध्य करताना थोडा जरी विरोध झाला तरी त्या विरोधाच्या विरोधात बंड करून उठणारच खरा माणूस.....!
    बहिणाबाई चौधरी हेच सांगून गेल्या........
 "मन वढाय वढाय .....उभ्या पिकातलं ढोर.....
  किती हाकलं हाकलं ...फिरी येतं पिकावर..!"


Sunday, 8 January 2012

थोडं जुनं...!.. बरचसं नवं.....!!

     सुरुवात चांगली झाली की मग पुढील कामाला एक वेगळाच उत्साह येतो. माधुरीने (माझी भाची) कालचे लिहिलेले आवडल्याचे कळविले. ते वाचून मन भूतकाळात निघून गेले. काळाचा महिमा अगाध असतो म्हणतात तेच खरे ! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या काळात पत्रांना खूप महत्व होते. आपल्या आप्त मित्रांना पत्रे लिहिण्यात ती आठवणीने पोस्टात नेऊन टाकण्यात जी मजा होती ती शब्दांनी व्यक्त होण्यासारखी नाही. ती मजा ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच ती माहिती आहे. पुन्हा आपण पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची वाट पाहण्याची मजा सुद्धा काही वेगळीच होती. एक पत्र पाठविणे व त्याचे उत्तर येणे यात १५-२० दिवस  सहज निघून जायचे. या सर्व प्रकारात एक आतुरता रहायची...एक गोडवा राहायचा...आपुलकी असायची....व बरीचशी हुरहूर पण असायची.
     काळाच्या ओघात हे वरील सर्व नामशेष झालेले आहे. पत्रांची जागा पहिल्यांदा पेजर नंतर टेलिफोन, मोबाईल, इ-मेल, एस एम एस , इत्यादींनी घेतली. सर्व काही फास्ट झालेले आहे. ज्याला पत्र पाठवायचे त्याचा प्रत्यक्ष आवाज मोबाईल वर ऐकू येवू लागल्यावर कोणी कशाला ........पोस्टात जा.......पत्र विकत घ्या......ते लिहा.......पुन्हा पोस्टात जा......ते पत्रपेटीमध्ये  टाका....... मग नंतर पुन्हा उत्तराची वाट पहा.......एवढा द्राविडी प्राणायाम करेल...?
      टीव्ही वरील एक जाहिरात .......इंडिया हो गया 3G मे बिझी ...........पुन्हा माझा सनीला प्रश्न.....सनी ने सांगितलेली 3G ची माहिती........मी विचारात मग्न...... डोळ्यांसमोर धुके धुके........आतापर्यंत भूतकाळात  गेलेले मन.......हळू हळू ...धुक्यातून.....भविष्य काळात शिरते......मी माझ्याच घरात बसलेला....केस पूर्ण पांढरे झालेली सुनिता सोबत बसलेली.....माझ्या टकलावर पण पडक्या किल्ल्यासारखे भग्नावशेष उरलेले....आजूबाजूंच्या घरांवर दिव्यांच्या माळा.......सायंकाळची वेळ......तेवढ्यात फोन वाजतो.....
"ए.....पहा जरा कोण आहे ते......." मी सुनिताला सांगतो.
"सनीचा  फोन आहे ......."सुनिता उत्तरते.
"बघ काय म्हणतो ते...."
"तुम्हीच बोला त्याच्याशी..."
"का....?"  
"दुपारीच आमचं बोलणं झालं.......या दिवाळीत घरी यायचं नाही म्हणतो तो......"
मी फोन बंद होण्याच्या आत घाईघाईत उचलतो....."हल्लो सनी....."
"हल्लोव बाबा ....आईने सांगितले काय तुम्हाला....."
"काय ते....?"
"बाबा आम्ही या वेळी दिवाळीत बुलडाण्याला नाही येवू शकणार......सॉरी बाबा पण अत्यावश्यक काम निघालं......नाही येता  येणार.... ही पण माहेरी जाणार नाही.....तुमचा छोट्या तर भाऊआजोबांना भेटायला उतावीळ झाला आहे ......पण नाईलाज झाला हो.....आईला दुपारी सांगितलं ......ती नाराज झाली...." हळू हळू त्याचा आवाज  रडवेला झालेला......
मी माझ्या डोळ्यांच्या कडा पुसत परंतु संयमाने...कातरस्वरात .. "अरे...नाराज कशाला होतो आहेस......आपले 3G connection आहे न...सोनी च्या ४० इंची monitor समोर बसून  आम्ही इकडे लक्ष्मी देवीची पूजा करू......तुम्ही तिकडून हात जोडा.......आम्ही कॅमेरा समोर आमचे पाय ठेवू ..... तुम्ही तिकडून नमस्कार करा......तुझा छोट्या तिकडे कॅमेरा समोर फटाके उडवील आम्ही स्क्रीन वर बघून आमचे डोळ्यांचे पारणे फेडू......!......!!.....!!!.....!!!!!

Saturday, 7 January 2012

सहज सुचलं म्हणून .......पहिलं पाऊल....!



 आज प्रथमच काहीतरी लिहिण्याची संधी मिळतेय. तसं पाहिलं तर अनेक वेळा अनेकांनी मला लहानपणापासून आतापर्यंत म्हणजे वयाच्या पन्नाशी पर्यंत लिहायला भाग पाडलेल आहे. लहानपणी शिक्षकांनी लिहायला सांगितलेल्या निबंधापासून तर कालपर्यंत साहेबांनी dictate केलेल्या पत्रांपर्यंत आजतागायत काही ना काही तरी लिहितोच आहे. परंतु ते लिखाण म्हणजे कर्तव्य पूर्तीचा एक भाग ! शिक्षकांच्या छडीचा मार असो किंवा साहेबांच्या तोंडचा भडीमार असो ....तो चुकविण्यासाठी असे जबरदस्तीने मी अनेकवेळा असंख्य  लिखाण केलेले आहे. इंटरनेट वर बसून रात्र रात्र जागणाऱ्या माझ्या मुलाकडे  मी आज एक इच्छा प्रदर्शित केली ....मी त्याच्या laptop वर चाललेल्या कामात (बहुधा कुणाशीतरी चाटींग असावे,,,) व्यत्यय आणून म्हणालो......"अरे सनी...."   
त्याने काम्पुटरमधली मान वर न करताच "काय ..." अश्या अर्थाने मान हलविली..
"मलाही शिकव ना....." मी चाचरत काहीतरी पुटपुटलो ...!
यावेळी मात्र त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले....
इंटरनेट........! इंटरनेट शिकव ना मलापण .....! 
एखादे भूत बघितल्यासारखी त्याची चर्या बघून मलाच माझी लाज वाटू लागली ....
मी काहीही बोलायच्या आत तो किंचाळला ...."काय हे बाबा...."
'का...? काय झालं......?.....मी
"इंटरनेट काय शिकायची  गोष्ट आहे...?"
"मग....."
"अहो असं शिकवून कधी कुणाला इंटरनेट येते का ?"
"मग कसं येते ?"
"ते आपलं आपणच शिकायच असते !"
"मी नाही का तुला लहानपणी सायकल शिकवली..."
"ते वेगळं आहे..." 
"....नंतर मोटरसायकल शिकवली...."
"ते वेगळं हो.... "
"त्याच्याही आधी तुझा हात धरून तुला पायी चालायला शिकवलं होतं...."
आता मात्र त्याच्या सहनशक्तीचा अंत झालेला होता.......
त्याने विचित्रपणे माझ्याकडे पहिले...... आपला laptop बाजूला ठेवला..."तुम्हाला काय हवंय....?"
"मला इंटरनेट शिकायचं आहे .... "
"मी सांगितलं नं यार मघाशी तुम्हाला ..... आणि लहानपणी सायकल शिकवतांना किती वेळा पाडलं मला ...."
"मग आता तू पाड  मला.. "
"त्यापेक्षा तुम्ही यात पडूच नका ना..." 
"ठीक आहे...."  मी चेहेरा पाडून म्हणालो....
माझ्या पडलेल्या चेहेऱ्याकडे पाहून त्याला वाईट वाटले असावे बहुधा .... तो म्हणाला ..."मी तुम्हाला एक ब्लॉग  उघडून देतो तुम्ही त्यात काहीतरी लिहित जा....."
"ब्लॉग म्हणजे काय...?"....मी काहीही न समजून विचारले....
"ते काही विचारून मला बोअर करू नका ....अमिताभ बच्चन कसं त्याच्या ब्लॉग वरून लिहितो तसं तुम्ही तुमच्या ब्लॉग वरून लिहित जा....."
लिहिण्याच्या विचाराने माझ्या पोटात गोळा उठला ....आणि ....लहानपणापासूनच्या माझ्या शत्रूंच्या यादीमध्ये मी माझ्या मुलाचे नाव add केले ..! 
तो पुढे म्हणाला ...."तुम्ही ब्लॉगवर दररोज काहीतरी लिहित जा..."
"पण ते वाचणार कोण...?"
"वाचणारे वाचतील ...नाहीतर नाही वाचणार....... पण तुम्ही यामुळे हळूहळू इंटरनेट शिकून जाल.....!"
मला ही कल्पना खूप आवडली. मी लगेच होकार भरला.. त्याने माझे ब्लॉग वर खाते उघडले..व मी शुभस्य शीघ्रम ...या उक्तीप्रमाणे लगेच कामाला लागलो व त्याचे परिणाम तुम्ही पाहताच आहात .............!!!
                                                                                                                                          धन्यवाद...!